नागपूर : भाजपनं राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपच्या नेत्यांनी या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी या निवडणुकीतील विजयासंदर्भात संवाद साधला. भाजपला तीन राज्यांमध्ये अभूतपूर्व यश मिळालेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार गरिबांसाठी काम करत आहे हे बिंबवलं, त्याचा हा विजय आहे. या सर्व राज्यांमधील जनतेचे आभार मानतो. या राज्यातील विजयाचं श्रेय नरेंद्र मोदी यांचं आहे. जे.पी. नड्डा आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट अमित शाह यांच्यासह राज्यातील टीम आणि राष्ट्रीय टीम यांचं अभिनंदन करतो,असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
भाजपची या निवडणुकीत १० टक्के मतं वाढलेली आहेत. छत्तीसगडमध्ये १४ टक्के, मध्य प्रदेशात ८ टक्के आणि तेलंगाणात १० टक्के मतं वाढली आहेत. देशातील जनतेचा विश्वास नरेंद्र मोदींवर आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाची ही नांदी आहे. आता इंडी आघाडीची बैठक होईल आणि या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जाईल आणि जनता मोदींसोबत जाईल. महाराष्ट्रात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. दोन तृतियांश जागा महायुतीनं जिंकल्या. लोकसभेला हेच चित्र पाहायला मिळेल. महाराष्ट्रात आणि देशात भाजप आपल्याला पाहायला मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत मागचे सर्व विक्रम भाजप मोडीत काढणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.