मुंबई : केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजनेप्रमाणे राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांना 2 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. यानंतर आणखी एक मोठी योजना शिंदे-फडणवीस सरकारने आणली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फिडर सोलरबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्याला वर्षाला एकरी 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या योजनेचा फायदा पडीक जमिन असलेल्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे मिळत राहणार आहे. सोलार पॅनल लावण्यासाठी जर शेतकऱ्याने 30 वर्षांच्या करारावर त्याची जमिन राज्य सरकारला दिली तर त्या बदल्यात राज्य सरकार त्या शेतकऱ्याला वर्षाला एकरी 50 हजार रुपयांचे भाडे देणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
पर्यावरणाच्या हानीला आळा बसणार
महत्वाचे म्हणजे या भाड्यामद्ये दर वर्षाला 3 टक्क्यांची वाढ होणार आहे. सोलारसाठी मोठे गुंतवणूकदार पैसे गुंतविण्यास तयार आहेत. यामुळे ही वीज राज्य सरकारला 3 रुपये 30 पैसे प्रति युनिट अशी पडेल. कोळशामुळे होणारी पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणेवर्ष 2025 पर्यंत 30 टक्के वाहिन्यांना सौर ऊर्जेचा पुरवठा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.